मुंबई – राज्यातील पुनश्च हरिओम अंतर्गत जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती. आता गणेसोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असणार आहे.
अत्यावश्यक सेवेशिवाय लॉकडाउनमध्ये एसटीची राज्यातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी दिली होती. तालुका ते गाव ते तालुका-जिल्हा सुरु असणारी एसटी आता जिल्ह्याच्या बाहेरही धावणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना महामारीमुळे देशासह राज्यात सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. यातच राज्यात जिल्ह्यांतर्गत एसटी सेवाही 23 मार्चपासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे लॉकडाऊन काळात एसटीला दररोज 22 कोटींचा फटका बसला होता. त्यानंतर 22 मे पासून राज्यातील रेड आणि कंटेन्मेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र जाचक अटी आणि नियम घातल्याने प्रवाश्यांनी खासगी वाहनांनी प्रवास करण्यास सुरवात केली होती.
हक्काची लालपरी बंद असल्याने नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यातच राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशेत्सवाचा सण साजरा केला जातो. तीन दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना एसटीने प्रवास करता यावा अशी मागणी जोर धरत होती. त्यानुसार राज्य सरकारने आज महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे.