कोल्हापूर – कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी परीक्षा अद्यापही सुरूच असून यामुळे दोघींची लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील कंजारभाट समाजातील दोन तरुणींचा विवाह बेळगावमधील दोन सख्ख्या भावांशी झाला होता. विवाह थाटामाटात झाला पण त्यानंतर विवाहाच्या पहिल्याच रात्री या दोन्ही तरुणींची कौमार्य चाचणी केल्याच उघड झालंय. बेळगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. यापेक्षा धक्कादायक म्हणजे या चाचणीत दोन्ही तरुणी नापास ठरल्याचा दावा करुन झाडाची फांदी मोडून, जात-पंचायत भरवून जात पंचायतीने हा विवाह मोडीत काढला.
या धक्कादायक प्रकाराने कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागात खळबळ उडाली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा सगळा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणींना आणि त्यांच्या आईला विश्वासात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाणे गाठलं. अखेर दोन्ही नवरदेवांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाचं म्हणजे यापैकी एक नवरदेव हा भारतीय सैन्य दलात असून, त्याने आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या दोन्ही तरुणी सध्या कोल्हापूरमध्येच वास्तव्याला आहेत. आम्ही तुम्हाला नांदवणार नाही असं जात पंचायतीमार्फत सासरच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. त्यामुळे कौमार्य चाचणी करणाऱ्या कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.