मुंबई – लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करताना प्रवाशाकडे रिझर्व्हेशन असले तरी रेल्वेच्या डब्याबाहेर लावण्यात येणारी आरक्षणाची यादी तपासल्याशिवाय प्रवासी पुढे जात नाही. १ सप्टेंबरपासून ही यादी प्रवाशांना शोधूनही सापडणार नाही कारण ही यादी डब्याबाहेर लावण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. हा नियम संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेला आहे. या निर्णयाची माहिती ज्या प्रवाशांना नाही त्या प्रवाशांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
देशातील ७० टक्क्यांहून अधिक रेल्वे तिकीटे आता इंटरनेटद्वारे विकत घेतली जातात. तिकीट विकत घेतावेळी प्रवाशाचा मोबाईल नंबर व इमेल आयडी विचारला जातो. तिकीटाचा सगळा तपशील नोंदणी झाल्यानंतर मोबाईल आणि ईमेलवर पाठवला जातो. त्यामुळे डब्याबाहेर लावण्यात येणारी यादी बघण्याची गरज फारशी उरलेली नाही आहे. यामुळेच ही यादी डब्यांबाहेर लावण्याची प्रथा बंद करण्यात येत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबईतील काही स्थानकांत चार महिन्यांपूर्वीच हा नियम लागू करण्यात आला होता ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस या स्थानकांचा समावेश होता. ही यादी बंद करण्याचा निर्णय घेत असतानाच आता आरक्षणाची माहिती देणारे इलेक्ट्रॉनिक फलक किंवा किऑस्क लावण्याचा विचार सुरू आहे. या किऑस्कवर पीएनआर नंबर टाकला की प्रवाशाला त्याच्या आरक्षणाचा तपशील तपासता येणार आहे.
रिझर्व्हेशन यादी न लावण्याच्या निर्णयामुळे अंदाजे २८ टन कागदाची बचत होणार आहे. सध्या ई तिकीट, एसएमएसवर रिझर्व्हेशनची माहिती पाठवणे, रेल्वे स्थानकांवर डिजीटल डिस्प्ले अशा वेगवेगळ्या पर्यांयावर रेल्वेकडून भर दिला जात आहे. तसेच प्रवासी १३९ क्रमांक डायल करून देखील रेल्वेची माहिती मिळवू शकतात, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.