ठाणे – शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते अनंत तरे यांचे सोमवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे ठाणे जिल्हा एका मोठ्या नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान, ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचे निधन झाले असून आज दुपारी 2 वाजता ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मेंदूतील रक्तस्त्रावामुळे अनंत तरे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली आणि सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. तरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे व भाऊ असा परिवार आहे.
ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी 1993 मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविले. त्यानंतर 1994 आणि 1995 सालीही त्यांनी महापौरपद भूषविले होते. ठाण्यात महापौरपदाची हॅट्ट्रिक साधणारे ते एकमेव नगरसेवक होते. 2000 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर 2006 मध्येही ते विधान परिषदेसाठी उभे होते. मात्र यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी पराभूत केले होते. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापल्याने ते नाराज झाले होते. तसेच 2008 मध्ये त्यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड करण्यात आली. 2015 मध्ये त्यांची पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. शिवाय ते एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते. राजकारणाबरोबरच त्यांचे सामाजिक चळवळीतील योगदान मोठे होते. त्यांच्या जाण्याने ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.