कोलकाता- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्ष स्वबळावर सत्तेत येणे कठीण असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले आहे. भाजपला 2019 च्या निवडणुकांमध्ये हरवायचे असेल तर काँग्रेसच्या सहयोगी पक्षांनी काही गोष्टींवर तडजोड करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी कोलकात्यात एका मुलाखतीत सांगितलेे.
भाजपला सत्तेतून घालवायचे असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येक समविचारी पक्षाला आघाडी होणे गरजेचे वाटत असेल तर काही गोष्टींवर तडजोड करावीच लागेल, काँग्रेसही तडजोडीसाठी तयार आहे. मात्र सहयोगी पक्षांनी काँग्रेसला वेठीस धरण्याचा प्रयत्न करु नये. खुर्शीद यांनी आपली भूमिका मांडली. काँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकते का, असा प्रश्नावर विचारले असता खुर्शीद यांनी नकार दिला. सध्याच्या घडीला ही गोष्ट शक्य नाही. जर आम्हाला स्वबळावर सत्तेत यायचे असेल तर गेल्या 5 वर्षांमध्ये तशी विधायक कामे होणे गरजेचे होते. निवडणुकांच्या आधी काही काळ तुम्ही अचानक स्वबळावर लढून सत्तेत येण्याची भाषा कराल तर तसे होणे शक्य नाही. सध्या समविचारी पक्षांसोबत आघाडी करणे हे काँग्रेससमोरचे उद्दीष्ट असून सध्या त्यावर काम सुरु असल्याचे खुर्शीद यांनी सांगितले.